मनमाड: केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून असलेले भाजपचे सरकार हे फसवेगिरीचे सरकार असुन त्यांच्यावर विश्वास ठेवू नका देशाची सत्ता मोदीच्या हातात आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. आज नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद सर्वच निवडणुका थांबल्या याच्यामुळे. लोकशाही जिवंत राहणार नाही. भविष्यात ते सर्वच निवडणूक बंद करतील. यामुळे या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनमाड येथे जाहीर सभेत व्यक्त केले. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे आई यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर सटकून टीका केली. येत्या 4 तारखेला जे होईल ते देशाला आणि जगाला समजेल असेही पवार म्हणाले.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, देशाचा पंतप्रधान नाशिक जिल्ह्यात आले आणि येथील प्रश्नांवर न बोलता ते तुमच्या गळ्यात मंगळसूत्र राहणार नाही काँग्रेस तुमच्या घरातील सोन घेऊन इतरांना वाटेल असे बोलले. असे बोलून त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. असं कधीच होणार नाही. ते विचारतात शरद पवार यांनी 10 वर्षात काय केलं. मी अन्न धान्य पूर्ण देश केलं. परदेशातून धान्य का आणावे. राज्यात या एका महिन्यात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी कृषी मंत्री असताना याच मनमाड मध्ये माझी सभा होती. येथे कळलं कि निर्यात बंदी केली थेट दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यात उठवली होती असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र हे सरकार कांदा, कापूस, सोयाबीन वर बंदी लावत आहे.मोदी अभिमानाने सांगतात आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो धान्य पीकवितो कोण? पिकवणाऱ्याचा विचार करणार कि नाही. हे सरकार फसवेगिरीचे सरकार आहे त्यांचेवर विश्वास ठेऊ नका.



