तलाठी व ग्रामसेवक आता कामाच्या गावातच राहणार
राज्य सरकार बांधणार शासकीय निवासस्थाने; ग्रामस्थांची वणवण थांबणार
मुंबई / चंद्रपूर :✍️ अभिषेक भागडं
राज्यातील ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी वारंवार तालुका व जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे तलाठी आणि ग्रामसेवकांना त्यांच्या नियुक्तीच्या कामाच्या गावातच वास्तव्यास राहणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी शासकीय निवासस्थाने उभारली जाणार आहेत.
सध्या अनेक तलाठी व ग्रामसेवक आपल्या मूळ गावांपासून २० ते ३० किलोमीटर अंतरावर राहतात. त्यामुळे ग्रामस्थांना साध्या प्रमाणपत्रांसाठी, फेरफार, सातबारा, जन्म–मृत्यू दाखले यांसारख्या कामांसाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. या अडचणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्याचे महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पुढाकारातून ही योजना राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या गावांमध्ये तलाठी व ग्रामसेवक कार्यालयांसाठी इमारती उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी निवासस्थानांची बांधणी केली जाईल. भविष्यात ही योजना संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्याचा शासनाचा मानस आहे.
या निर्णयामुळे तलाठी व ग्रामसेवक २४ तास गावात उपलब्ध राहणार असून, ग्रामस्थांची कामे अधिक जलद व पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहेत. तसेच प्रशासनावरचा ताण कमी होऊन ग्रामीण भागातील सेवा अधिक गतिमान होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, नव्या निवासस्थानी पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षिततेसह मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही गावात वास्तव्यास राहणे सुलभ होणार आहे.
या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, “गावातच अधिकारी उपलब्ध असतील तर वेळ, पैसा आणि त्रास वाचेल”, अशी प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा निर्णय ग्रामीण प्रशासनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
—🙏 जय विदर्भ 🙏—( बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732)




