Home Breaking News सुधीर पाठक यांनी संयमित लिखाणातून विश्वास निर्माण केला

सुधीर पाठक यांनी संयमित लिखाणातून विश्वास निर्माण केला

सुधीर पाठक यांनी संयमित लिखाणातून विश्वास निर्माण केला
Sudhir Pathak built trust through restrained writing

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : गडकरी यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सत्कार

नागपूर:- संघ ज्याला आत्मसात झाला, तो संयमित लिखाण करतो आणि त्याचा सर्वांना आधार वाटतो. तरूण भारतचे निवृत्त मुख्य संपादक सुधीर पाठक यांनी आपल्या कारकीर्दीत इतरांना आधार देऊन प्रोत्साहित केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

दै. तरुण भारतचे निवृत्त मुख्य संपादक सुधीर पाठक यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा पाठक कुटुंबीयांतर्फे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकरी, सुधीर पाठक व त्यांच्या पत्नी नीलिमा पाठक व्यासपीठावर उपस्थित होते. ‘संघात येणे आणि संघ आत्मसात होणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. संघ आत्मसात झालेल्या व्यक्तींचा आधार समाजाला वाटत असतो. त्यामुळे विश्वास निर्माण होतो, तसा विश्वास सुधीर पाठक यांनी आपल्या साक्षेपार्ह आणि संयमित लिखाणातून आणि व्यवहारातून निर्माण केला,’ असे गौरवोद्गारही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले.

गडकरी म्हणाले, ‘पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार देण्याची गरज आहे. हेच काम सुधीर पाठक यांनी व्रतस्थ जीवन जगत संयमित पद्धतीने केले. त्यांच्या लिखाणाची जोड आज नव्या पीढीला मिळणे आवश्यक आहे.’
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते सत्कार होण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझी कमाई आहे, या शब्दांत सुधीर पाठक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मान्यवरांच्या हस्ते सुधीर पाठक लिखित ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्रीकांत गाडगे, अनिल राजूरकर या त्यांच्या मित्रांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर नंदा आपटे, साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया, मृणाल नानिवडेकर यांनी सुधीर पाठक यांच्यातील गुणांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यासोबतच तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी व श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी देखील आठवणींना उजाळा दिला.