वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील लोणार गावातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. पुरेशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत लोणार येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने वरोरा आगाराच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने नियमित एस.टी. बस सेवा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या:
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान: गावातील शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुला-मुलींना दैनंदिन प्रवासासाठी नाहक पायपीट करावी लागते किंवा असुरक्षित व खर्चिक खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.
- रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांचे हाल: वैद्यकीय उपचारासाठी किंवा तातडीच्या कामासाठी वरोरा येथे ये-जा करताना ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
- शेतकरी व कामगारांची कुचंबणा: शेतीमालाची बाजारात ने-आण करण्यासाठी तसेच रोजगाराच्या निमित्ताने वरोरा शहरात येणाऱ्या कामगार व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
🙏ग्रामस्थांची आक्रमक भूमिका🙏
लोणार गावासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नियमित बस फेऱ्या (किंवा मुक्कामी बस) लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या या रास्त व अत्यंत गरजेच्या मागणीचा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक त्वरित विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, यावर तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास समस्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दमही प्रशासनाला देण्यात आला आहे. या निवेदनावर श्री. निखिल भाऊ मांडवकर, श्री. रोशन भाऊ नारे यांच्यासह लोणार येथील समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




