Home जिल्हा जन्माष्टमी निमित्त ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेस तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

जन्माष्टमी निमित्त ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेस तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

ब्रह्मपुरी :- देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची हंडी जनताच फोडणार  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार जन्माष्टमीक निमित्त ब्रह्मपुरी येथे युवक काँग्रेस तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन.बोरगाव ता. ब्रम्हपुरीच्या गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मपुरी शहरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. विजय वडेट्टीवार यांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “श्रीकृष्णाने अन्याय आणि अधर्माविरुद्ध लढा दिला. आज देशातील जनता देखील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करत आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही आश्वासने दिली तरी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आगामी काळात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराची हंडी जनताच फोडणार,” असा घणाघात त्यांनी केला.



आ. वडेट्टीवार म्हणाले की, दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून एकजुटीचे आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक आहे. गोविंदा पथकातील प्रत्येकजण एकमेकांना आधार देत हंडी फोडतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. युवकांनी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मपुरी शहर, तालुका तसेच इतर जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात गोविंदांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा थरारक प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.



यावेळी “गोविंदा आला रे आला”, “जय श्रीकृष्ण” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तरुणाईच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण कृष्णमय झाले होते. आयोजकांच्या वतीने गोविंदा पथकांचे स्वागत करण्यात आले तसेच सहभागी युवकांना प्रोत्साहन देण्यात आले.
आ. विजय वडेट्टीवार यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना भगवान श्रीकृष्णाचा सत्य, न्याय आणि धर्माच्या मार्गाचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन केले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि तरुणांच्या सकारात्मक ऊर्जेला चालना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी बोरगाव तालुका ब्रह्मपुरी येथील जे एन डी गोविंदा पथकाने ६ थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रथम बहुमान संपादित केला. तर गोंदिया येथील शीतला माता पथकाने द्वितीय आणि मोठी दिघोरी जिल्हा भंडारा येथील गोविंदा पथकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या गोविंदा पथकांना अनुक्रमे प्रथम पथकाला 1 लक्ष 11 हजार 111 रोख , द्वितीय गोविंदा पथकाला 77 हजार 777 रोख, व तृतीय गोविंदा पथकाला 33 हजार 333 रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.



कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, प्रा. देविदास जगनाडे, शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, उपनगराध्यक्ष डॉ. नितीन उराडे, युवक काँग्रेस नेते सोनू नाकतोडे,अतुल राऊत, अमित कन्नाके,प्रिन्स नंदुरकर, रवी पारधी,सुधांशू अलोने, सूरज मेश्राम, मोहन मिसार, डेनी शेंडे, काँग्रेस पदाधिकारी,
कार्यकर्ते, गोविंदा पथकांचे सदस्य, युवक, महिला आणि ब्रह्मपुरी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसने अथक परिश्रम घेतले.