Home Breaking News चंद्रपूर मनपावर गंभीर आरोप; अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जाचा दावा, १०...

चंद्रपूर मनपावर गंभीर आरोप; अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जाचा दावा, १० दिवसांत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा.

वरोरा:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या खाजगी मालमत्तेवर बनावट मालमत्ता कर आकारणी तक्ता तयार करून बेकायदेशीर कब्जा करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नगीना बाग येथील श्री. मुन्ना विठ्ठल तावाडे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने चौकशी व न्यायाची मागणी केली आहे.




तावाडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मालमत्ता मौजा भानापेठ, एकोरी वॉर्ड, शीट क्रमांक ५१, नगरभूखंड क्रमांक ६६७९, क्षेत्रफळ १०१.५० चौ.मी. येथे असून, संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट मालमत्ता कर आकारणी तक्ता तयार करून त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा केला. या घटनेमुळे त्यांचे कुटुंब बेघर झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या तक्रारींच्या प्रती नगरविकास मंत्री, महसूल मंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.




श्री. तावाडे यांनी सांगितले की, न्यायासाठी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना १८ लेखी निवेदने दिली असून १३ वेळा प्रत्यक्ष भेट घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही आयुक्तांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून अहवाल मागविल्याचा, तसेच शहर पोलीस ठाण्याकडूनही या संदर्भात पत्रे पाठविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीत त्यांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेचा तातडीने ताबा परत द्यावा आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.




दरम्यान, “येत्या दहा दिवसांत न्याय मिळाला नाही तर मी आणि माझे संपूर्ण कुटुंब सामूहिक आत्मदहन करू,” असा इशारा श्री. तावाडे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे.