Home जिल्हा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ९५९७ घरकुलांसाठी ४४ कोटींची मंजुरी...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ९५९७ घरकुलांसाठी ४४ कोटींची मंजुरी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा.गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा फलदायी

चंद्रपूर : ‘घर म्हणजे केवळ घर नसतं… असल्या जरी चार भिंती… तरी जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं’. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणारे, जिव्हाळा जपणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. गरिबांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेला निवारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ९५९७ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या घरकुलांसाठी तब्बल ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

या मंजुरीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यांनी वारंवार पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष संवाद साधत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यास शासनाला भाग पाडले.

विशेष म्हणजे, या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करत गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी ठाम आणि आग्रही भूमिका मांडली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील ९५९७ कुटुंबांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि स्थिर निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असून, या योजनेमुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. या निर्णयामुळे केवळ घरकुलांची उभारणीच नव्हे, तर गरिबांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, ९५९७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.