दूषित पाण्यामुळे चिमुकल्याचा बळी; तरीही प्रशासन ढिम्म
वरोऱ्यातील विदर्भ मल्टी सर्व्हिसेस’वर कारवाई कधी? – नगरसेवका चा आरोप
वरोरा : शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीविरोधात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू होऊनही संबंधित कंपनीवर कारवाई न करणे म्हणजे प्रशासनाचे अपयश असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकानी केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून वरोरा नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा देखभालीचे काम करणाऱ्या या कंपनीकडून सातत्याने हलगर्जीपणा होत असल्याचे आरोप आहेत. दूषित पाण्यामुळे शहरात साथीचे आजार पसरले, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ झाला आणि अखेर एका निष्पाप बालकाचा बळी गेला. हा मृत्यू अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त शवविच्छेदन अहवालानुसार सदर बालकाचा मृत्यू दूषित पाणी पिल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असली, तरी नगरपरिषद प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, हे गंभीर आहे.
नगरसेवक तथा भाजपा व शिवसेना शिंदे गट यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला तात्काळ काळया यादीत (blacklist) , तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. “नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन हे जनतेच्या जीवाशी खेळत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
जर तातडीने कारवाई झाली नाही, तर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वरोऱ्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन नेमके कोणाच्या प्रतीक्षेत आहे, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक खेमराज कुरेकार, संतोष पवार, गणेश भिवदरे प्रवीण चिमूरकर, कुणाल रुयारकर, वर्षा पिसाळ , नलिनी आत्राम, नुपुर तेला, लता हिवरकर, सीमा तडस, मनीषा दानव, लीना गायनेवार, शंभुनाथ जी वरर्गणे हे उपस्थित होते.
🙏जय विदर्भ🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️ 8329889732




