⭕🙏 माणुसकीच्या सेवेला वाहिलेल्या एका महान प्रवासाची गाथा🙏⭕

एक सहल, एक निर्णय… आणि बदललेलं आयुष्य!
लोकबिरादरी प्रकल्प : माणुसकीच्या सेवेला वाहिलेल्या एका महान प्रवासाची गाथा

भामरागड : ✍️ अभिषेक भागडे
कधी कधी आयुष्यात एखादी साधी घटना संपूर्ण जीवनाला नवी दिशा देते. अशीच एक साधी कौटुंबिक सहल पुढे जाऊन हजारो आदिवासी कुटुंबांच्या आयुष्याला प्रकाश देणारा ऐतिहासिक निर्णय ठरली — आणि त्यातूनच जन्म झाला लोकबिरादरी प्रकल्पाचा.
२३ डिसेंबर हा दिवस लोकबिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेचा — म्हणजेच माणुसकीच्या सेवेला समर्पित झालेल्या एका महान विचाराचा जन्मदिन. या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात झाली होती आनंदवनातून, बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या एका अनोख्या निर्णयातून.
बाबा आमटे यांची दोन्ही मुले — डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे — नुकतीच एम.बी.बी.एस. (MBBS) पूर्ण करून घरी परतली होती. आयुष्यातील हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी बाबा यांनी “सहल” ठरवली. मात्र, ही सहल कोणत्याही पर्यटनस्थळी नव्हती. “कुठे चाललो आहोत?” याची कल्पनाही न देता, त्यांनी थेट मुलांना भामरागडच्या घनदाट जंगलात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
तो प्रवास अत्यंत खडतर होता. रस्त्यांचा अभाव, सोयी-सुविधांचा पूर्ण अभाव आणि अवघे २५० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले. हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता, तर तो वास्तवाशी भिडवणारा अनुभव होता.
बाबा आमटे तरुणपणी भामरागड परिसरात आले होते. त्या आठवणींच्या खुणा मुलांना दाखवण्यासाठीच त्यांनी ही सहल आखली होती. मात्र, तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसले, ते केवळ डोळ्यांनी पाहण्यासारखे नव्हते — ते थेट मनाला हादरवणारे होते.
भामरागड परिसरातील माडिया गोंड आदिवासींचे जीवन अत्यंत दयनीय अवस्थेत होते. अज्ञान, शोषण, भीषण दारिद्र्य आणि आजारांनी ग्रासलेले हे समाजजीवन पाहून दोन्ही तरुण डॉक्टरांचे मन हेलावून गेले. परिस्थिती इतकी भयावह होती की, अंगावर नीट कपडे असलेला ‘सुशिक्षित’ माणूस दिसताच आदिवासी बांधव भीतीपोटी जंगलात पळून जात होते.
याच क्षणी बाबा आमटे यांच्या मनात एक ठाम विचार रुजला —
“इथे बदल घडवायचा असेल, तर तो कोणी बाहेरचा येऊन करणार नाही. हे काम आपल्यालाच करावं लागेल.”
वयाच्या साठीत पाऊल टाकत असताना बाबा आमटे यांनी एक नवं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाला साद दिली डॉ. प्रकाश आमटे यांनी, आणि या संघर्षमय वाटचालीत खंबीर साथ दिली डॉ. मंदाकिनी आमटे यांनी. सुखसोयी, सुरक्षित भविष्य आणि शहरातील प्रतिष्ठित वैद्यकीय कारकीर्द बाजूला ठेवून, त्यांनी थेट जंगलात माणसांसाठी जगण्याचा निर्णय घेतला.
२३ डिसेंबर १९७३ रोजी एका छोट्याशा झोपडीत लोकबिरादरी प्रकल्पाचे बीज पेरले गेले. आज पाच दशकांनंतर, ते इवलंसं बीज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. आज लोकबिरादरी म्हणजे केवळ रुग्णालय किंवा शाळा नाही, तर आदिवासी समाजासाठी सन्मानाने जगण्याची आशा आहे.
लोकबिरादरी प्रकल्पाने आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि मानवतेचा संदेश देत हजारो जीवनांमध्ये परिवर्तन घडवले. येथे आजही माणूस म्हणून माणसाचा सन्मान जपला जातो. ‘बिरादरी’ — म्हणजेच आपुलकी, समानता आणि माणुसकी — हीच या प्रकल्पाची खरी ओळख आहे.
एक सहल…
एक ठाम निर्णय…
आणि त्यातून उभा राहिलेला माणुसकीचा दीपस्तंभ —
लोकबिरादरी!
ही केवळ एक संस्था नाही, तर समाज परिवर्तनाची जिवंत चळवळ आहे.
-🙏 जय विदर्भ
🙏-{ बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️9673574711
☎️8329889732